मुंबई: महाराष्ट्रात मुंबई हा करोना साथीचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सगळेच चिंतातुर होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाचा वाढता ग्राफ खाली आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या निम्म्याहूनही खाली आली आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनाचे ७७ नवीन रुग्ण आढळले.

मुबंईत गेल्या तीन दिवसांपासून करोनाबाधीत नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुंबईत बुधवारी करोनाचे १८३ नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुरुवारी १०७ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन हा आकडा आज ७७ पर्यंत खाली आला आहे.

मुंबईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २ हजार १२० इतकी झाली आहे. मृत्यू झालेले १२१ रुग्ण धरून ही आकडेवारी आहे. गेल्या २४ तासांत ५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यातील तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर दोन रुग्ण वयोवृद्ध होते. करोना सदृष्य लक्षणे असलेले २०१ नवीन रुग्ण आज विविध रुग्णालयांत दाखल झाले. अशा रुग्णांची संख्या आता ५ हजार ८७९ इतकी झाली आहे.

आज ३७ जण करोनामुक्त

मुंबईकरांसाठी मोठी दिलासा देणारी बाब म्हणजे करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी १७ रुग्ण करोनामुक्त झाले होते, गुरुवारी २१ जणांनी करोनावर मात केली तर आज ३७ रुग्ण करोनाच्या विळख्यातून सुटले. आतापर्यंत मुंबईत २३९ रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here