divu ranadive award: ‘बातमी ब्रेक करण्याच्या नादात सामाजिक मूल्यांचे उल्लंघन’ – pratap asbe and anant bagaitdar awarded divu ranadive award by home minister dilip walse patil
मुंबई : ‘दिनू रणदिवे यांनी अतिशय जबाबदारीने पत्रकारिता केली. परंतु आज या व्यवसायाचे स्वरूप बदलेले आहे. सर्वात आधी बातमी ब्रेक करण्याच्या नादात अनेकदा सामाजिक मूल्यांचे उल्लंघन होते. या क्षेत्रात अनेक अप्रिय गोष्टी घडू लागल्या आहेत. केवळ लेखणीचे शस्त्र आपल्या हातात आहे म्हणून दहशत निर्माण करण्याची भावना निर्माण होते, त्याला आपल्याला पत्रकार म्हणता येणार नाही,’ असे स्पष्ट मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आणि अनंत बागाईतकर यांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वळसे पाटील बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार भवनात गुरुवारी आयोजित समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. करोनामुळे गेल्यावर्षी हा पारितोषिक वितरण समारंभ होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा दोन वर्षांची पारितोषिके एकत्रित वितरित करण्यात आली. बुढ्ढा होगा तेरा… युवा खेळाडूंना लाजवत दिनेश कार्तिकची तुफानी खेळी, भारताचा धावांचा डोंगर ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना २०२१ सालातील पारितोषिक, तर अनंत बागाईतकर यांना २०२२ सालचे पारितोषिक देण्यात आले. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष गुरबीर सिंग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे उपस्थित होते.
‘रणदिवे यांनी दलित, अपेक्षित, वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. वसंतदादा पाटील, जॉर्ज फर्नांडिस, शरद जोशी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. मात्र प्रसंगी त्यांनी त्यांच्याविरोधातही लिहिले,’ असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. ‘व्रतस्थ पत्रकार म्हणून दिनू रणदिवे यांनी काम केले. निर्भीड व्यक्ती म्हणून ते लोकशाही समाजवादी विचारांच्या भूमिकेवर ठाम राहिले. कधीकधी ते आपल्या भूमिकेवर इतके ठाम असत की ती टोकाची वाटे,’ असे मत डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले. राज्य सरकारतर्फे पत्रकारांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात दिनू रणदिवे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा समावेश करावा, अशी मागणी कार्यक्रमात बागाईतकर यांनी केली.