अग्निपथ योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी भाजप नेते, मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले. त्यामुळे भाजप आणि संयुक्त जनता दलाचे संबंध ताणले गेले आहेत. गृहमंत्रिपद नितीश कुमार यांच्याकडेच असल्यानं भाजप नेते संयुक्त जनता दलावर निशाणा साधत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यानंतर आता प्रकरण टोकाला जात असताना दिसत आहे. एनडीए सोडण्यासाठी कारण शोधत असलेले लोक एनडीए सोडू शकतात. त्यांच्यासाठी रस्ता मोकळा आहे, असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री नीरज कुमार सिंह बबलू यांनी केलं आहे.
नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या रेणु देवी, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरांवर नुकतेच हल्ले झाले. त्यानंतर भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यावर जदयूकडून ललन सिंह आणि उपेंद्र कुशवाहा यांनी पलटवार केला. याला आता भाजपचे मंत्री नीरज कुमार बबलू यांनी उत्तर दिलं आहे. ‘प्रत्येकाच्या मनात काही ना काही सुरू आहे. कोणताही बहाणा करून कोणाला जायचं असल्यास इथं कोणी त्यांचा पाय पकडून ठेवलेला नाही. मनात कोणताही बहाणा असेल तर त्यांना रस्ता मोकळा आहे. युती दोघांच्या सहमतीनं चालते,’ अशा शब्दांत बबलूंनी संयुक्त जनता दलानं सुनावलं.
शिवसेनेपाठोपाठ जदयू भाजपची साथ सोडणार?
२०१९ मध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडली. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये शिरोमणी अकाली दलानं भाजपला रामराम केला. सेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्रपक्ष होते. एनडीएचा विचार केल्यास भाजपनंतर सर्वाधिक खासदार शिवसेनेचे होते. २०१९ मध्ये सेनेचे १८ उमेदवार निवडून आले. त्याखालोखाल संयुक्त जनता दलाच्या खासदारांची संख्या आहे. त्यांचे १६ उमेदवार विजयी झाले होते. २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यात भाजपनं ७३, तर जनता दलानं ४३ जागा जिंकल्या.