त्यानंतर महाविकास आघाडीने भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. छाननी केल्यानंतर हे मतदेखील बाद ठरवण्यात आले. त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडीच्या कोट्यातील प्रत्येकी एक-एक मत बाद ठरले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झाले. या काळात २८५ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला. रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील मत बाद ठरल्यास वैध मतांची संख्या २८३ इतकी होईल. त्यामुळे उमेदवाराला जिंकण्यासाठीचा मतांचा कोटा कमी होऊ शकतो.
LIVE: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अखेर दोन तासांनंतर सुरुवात
ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांचे प्रयत्न, अपक्षांच्या भेटीगाठी सुरु होत्या, तर आमदार फुटू नये यासाठीही संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा दावा केला होता.
सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजप आमदार हरिभाऊ बागडेंनी पहिलं मतदान केलं. यावेळी भाजपने राज्यसभेपेक्षा वेगळी रणनीती आखली होती. भाजपने मतदान लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्ट्रॅटेजी ठरवली होती. तर काँग्रेस आणि शिवसेनेनेही वेळेपूर्वीच मतदान आटोपलं. यावेळी राष्ट्रवादीचे तीन आमदार हे मुंबईत न पोहोचल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, दुपारच्या सुमारास ते मतदानाला आले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी मिळवण्यासाठीही प्रयत्न केले मात्र सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला नाही.