गेली अनेक वर्षे या वारीच्या वाटेवर चार पावले चालणारे, एक दिवस जाणारे आणि संपूर्ण वारी करणारे असे वाढतच चालले आहेत. तिचे आकर्षण आणि आवाहन उणावलेले नाही; किंबहुना वाढते आहे. काहींनी टीका केली होती, तशी या विशाल भावदिंडीत छोट्या भूकदिंड्या असतीलही; मात्र आता तशी स्थिती बव्हंशी उरलेली नाही. असे असताना, या वारीचा आत्मा टिकवून ती कालसुसंगत होण्यासाठी प्रयत्न करणे, अतिशय आवश्यक होते आणि आहे. यातला पहिला प्रयत्न म्हणजे, अलीकडेच देहूतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या पालखी मार्गाचा विस्तार. याचे भूमिपूजन मागेच झाले आहे; मात्र पालखी मार्गाचे रुंदीकरण आणि त्यावरच्या सुविधा हे केवळ ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या वाटांपुरते मर्यादित राहता कामा नये. पंढरपुरात विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध संतांच्या पालख्या येत असतात. त्यांच्यासोबतही शेकडो वारकरी निष्ठेने चालत येतात. हे सर्व पालखीमार्ग पुरेसे रुंद, सर्व आवश्यक त्या सुविधांनी युक्त व्हायला हवेत. आधुनिक सुविधा ही काही भक्तिभावाला खोट आणणारी गोष्ट नसते. उलट, ती भक्तीला अधिक सुलभतेने ईश्वरप्रवण होण्यासाठी साह्यकारी ठरत असते.
या पार्श्वभूमीवर गेले काही वर्षे राबविल्या जाणाऱ्या ‘निर्मलवारी’ या उपक्रमाचे करावे तितके कौतुक थोडे होईल. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी शौचकूपांची व्यवस्था करून, विष्ठेची विल्हेवाट त्याच गावांजवळ शास्त्रीय पद्धतीने सोनखताच्या रूपाने लावणे, असा हा उपक्रम आहे. हे खूप आधीच व्हायला हवे होते. आता सामाजिक संघटना आणि सरकारी खाती यांनी हा उपक्रम एकाही दिंडीतल्या एकाही वारकऱ्याला उघड्यावर शौचाला बसू लागू नये, अशी व्यवस्था होईपर्यंत विस्तारत न्यायला हवा. हा निव्वळ सभ्यता किंवा शहरी सवयीचा मुद्दा नाही. रोगराई न पसरणे किंवा पालखी मार्गावरच्या गावांचे दैनंदिन जीवन विस्कळित, दुर्गंधित न होणे, वाटेवरचे जलस्रोत दूषित न होणे या सर्वच उद्दिष्टांसाठी हा उपक्रम आवश्यक आहे. अलीकडे गेली काही वर्षे पंढरपुरात येताना किंवा परत जाताना वारकऱ्यांच्या गाड्या किंवा पायी जाणाऱ्या दिंड्या अपघातात सापडण्याचे प्रमाण वाढते आहे. असा एकही अपघात होणार नाही, असे लक्ष्य सर्वांनी मिळून ठेवायला हवे. पंढरीच्या वारीचे सारे वैभव, सारा डौल आणि लवाजमा हा विठ्ठलाच्या चरणी जातानाचा असतो; मात्र पंढरीची ही वारी खरी पूर्ण होते, ती ‘परतवारी’ पार पडल्यावर. परतवारी म्हणजे ज्ञानेश्वर-तुकारामांच्या पादुका आषाढी झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्थानी परत येणे. या परतवारीत थोडेच वारकरी, मोजक्या सुविधा असतात. तिच्यावर फारसा प्रकाशझोत नसतो. जातानाचा भावजल्लोष आणि भक्ती जितकी खरी; तितकीच मोजक्या वारकऱ्यांची, कुणालाही तोशीस लागू न देणारी श्रांत परतवारीही खरी. हे दोन्ही मिळून वारीचे खरे सर्वांगदर्शन होते. अशी ही महाराष्ट्राला एकाच भावसूत्रात बांधणारी पंढरीची वारी आता प्रस्थान ठेवते आहे!