विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर विजयी झाले आहेत. अहिर यांच्या विजयामुळे वरळी मतदारसंघाला तिसरा आमदार मिळाला आहे. तीन आमदार असलेला वरळी हा राज्यातील बहुधा एकमेव मतदारसंघ असावा.

हायलाइट्स:
- वरळीला मिळाला तिसरा आमदार
- सचिन अहिर विधान परिषदेवर
- सुनील शिंदेंपाठोपाठ अहिर आमदार
कसे मिळाले तीन आमदार?
आदित्य ठाकरेंनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरलं. त्यानंतर त्यांच्यासाठी सेफ मतदारसंघ शोधण्यात आला. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच लोकांमधून लढत होती. त्यांच्यासाठी वरळी मतदारसंघ निवडण्यात आला. शिवसेनेचे सुनील शिंदे त्यावेळी वरळीचे आमदार होते. राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचा पराभव करून शिंदे विजयी झाले होते. अहिर यांनी विधानसभा निवडणूक २०१९ च्या काही महिने आधी सेनेत प्रवेश केला.
सुनील शिंदेंनी आमदारकी सोडली
मातोश्रीच्या आदेशावरून सुनील शिंदेंनी वरळी मतदारसंघ आदित्य यांच्यासाठी सोडला. आदित्य ठाकरे वरळीतून विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे मंत्री झाले. सुनील शिंदेंनी मातोश्रीच्या आदेशावरून आदित्य यांच्यासाठी मतदारसंघ सोडला. त्याचं बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे यांच्या रुपात वरळीला दुसरा आमदार मिळाला.
सचिन अहिर पुन्हा आमदार
आदित्य ठाकरेंच्या विजयात शिंदे यांच्यापाठोपाठ अहिर यांचाही मोठा वाटा होता. शिवसेना प्रवेशावेळी त्यांना मातोश्रीकडून शब्द दिला गेला होता. आता अहिर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वरळीला तिसरा आमदार मिळाला आहे. अहिर आणि शिंदे यांनी याआधी विधानसभेत वरळीचं प्रतिनिधीत्व केलं आहे. दोघेही वरळीतच राहतात. आदित्य यांचं निवासस्थान वांद्र्यात असलं, तरीही ते वरळीचे आमदार आहेत. त्यामुळे वरळीला तीन आमदार मिळाले आहेत. त्यातला एक आमदार मंत्रीदेखील आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : vidhan parishad election shiv sena leader sachin ahir wins worli gets second mlc sunil shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network