मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे पडसाद दिल्लीतही उमटले असून याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेस समितीने घेतली आहे. राज्यातील या नाराजीनाट्याचा काँग्रेस पक्षाला विशेष करून महाविकास आघाडीला फटका बसू नये याची जबाबदारी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांना निरीक्षक म्हणून नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला असून कमलनाथ आज, बुधवारी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आली. तसंच कमलनाथ हे मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी टाकला मोठा बॉम्ब; थेट उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

कमलनाथ यांच्यावरच का दिली जबाबदारी?

शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर राज्यात मंगळवार सकाळपासून बैठकांचा जोर वाढला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पक्षश्रेष्ठी आणि आमदारांची खलबते सुरू असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी दुपारीच अखिल भारतीय काँग्रेस समितीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थती हातळण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली.

कमलनाथ हे गांधी कुटुंबीयांच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक असे व्यक्तिमत्त्व आहे. काँग्रेसच्या कठीण काळात गांधी परिवाराच्या पाठीशी ते कायम उभे राहिले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी कमलनाथ यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कमलनाथ आज, बुधवारी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या पराभवाबाबतही चर्चा केली जाईल, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here