मुंबई: शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे पक्षातील तब्बल ३५ आमदार फोडून वेगळा ‘संसार’ मांडण्याच्या तयारीत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकार वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. बुधवारी सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी गुप्तचर यंत्रणेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. एका रात्रीत इतके आमदार सुरतला पोहोचल्याची खबर गुप्तचर यंत्रणांना कशी लागली नाही, याविषयी शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केले. ही बैठक आटोपल्यानंतर शरद पवार हे सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले आहेत. ते आता मुंबईत दाखल झालेले काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना भेटण्याची किंवा नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut: ‘जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल ना? शिवसेनेत राखेतूनही पुन्हा भरारी घेण्याची ताकद’
शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आता बिकट प्रसंगातून ते मार्ग काढून ठाकरे सरकार वाचवणार का, हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या आमदारांची फाटाफूट होऊ नये म्हणून आता पक्षाचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यातील या नाराजीनाट्याचा काँग्रेस पक्षाला विशेष करून महाविकास आघाडीला फटका बसू नये याची जबाबदारी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर सोपवली आहे. कमलनाथ हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना अशाप्रकारचे राजकीय पेच असलेली परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे. कमलनाथ हे सध्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर थांबले आहेत. या तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडी एखादा मोठा निर्णय घेते का, हे पाहावे लागेल.

शिवसेनेच्या आमदारांची बैठक

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर आपल्याकडे ४० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला होता. तसेच आणखी १० आमदार दुपारपर्यंत आपल्याला येऊन मिळतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने दुपारी पाच वाजता वर्षा बंगल्यावर आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here