मला उमेदवारी दिली असती तर एवढं घडलं नसतं!
राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी छत्रपती संभाजीजीराजेंनी खूप प्रयत्न केला. पण अपक्ष म्हणून नाही तर शिवसेनेत प्रवेश करा, शिवबंधन बांधा, अशी अट टाकल्याने छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेतली. शिवसेनेने कोल्हापूरचे एकनिष्ठ शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली. नाट्यमयरित्या राज्यसभेत त्यांचा पराभव झाला. पण राज्यसभेच्या निकालानंतर अवघ्या १० दिवसांत शिंदेंच्या बंडाने शिवसेना खिळखिळी झाली.
आज छत्रपती संभाजीराजेंना एकनाथ शिंदे यांच्या बंडावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती. एवढं सगळं प्रकरण घडलं नसतं”, असं म्हणत संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
भाईंचं बंड-ठाकरे सरकार अस्थिर
विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या बाईटमधून एकनाथ शिंदे माझ्याजवळ ४० आमदारांचं पाठबळ आहे, असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिंदेशाहीच्या शक्तीप्रदर्शपुढे उद्धव ठाकरेही हतबल आहेत. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.