मुंबई:एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असतानाच आता शिवसेनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही तासांमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर आमदार परत येण्याऐवजी आता शिवसेनेत असलेले आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. या पत्रात बुधवारी दुपारी पाच वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदरांना देण्यात आल्या आहेत. राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना अजूनही नेते मानता का? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंकडून फोन कट
या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटातील आमदार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत कोण उत्तीर्ण होतंय, हे लवकरच समजेल: संजय राऊत

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांबाबत भाष्य केले आहे. जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत तोपर्यंत मत व्यक्त करता येणार नाही. या सगळ्या प्रकरणातून शिवसेना तावुनसुलाखून बाहेर पडेल. निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत किती जण उत्तीर्ण होतात, हे भविष्यात समजेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here