आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही, अशी टीका करणाऱ्यांनाउद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या निधनानंतरचा घटनाक्रमच सांगितला. बाळासाहेबांचं निधन २०१२ मध्ये झालं. त्यानंतर आपण २०१४ मध्ये एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ६३ जागा निवडून आणल्या. त्यानंतर आपण सरकारचा भाग होतो. त्या सरकारमध्ये अनेकांना मंत्रिपदं मिळाली. ती शिवसेना बाळासाहेबांनंतरचीच शिवसेना होती, याची आठवण ठाकरेंनी करून दिली.
हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. सेनेला हिंदुत्वापासून दूर करताच येणार नाही. आपण आजही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. २०१२ नंतर म्हणजेच साहेबांच्याा निधनानंतर तुम्हाला जे काही मिळालं, पदं उपभोगलीत, ती साहेबांनंतरच्या सेनेनंच दिलीत याचा विसर पडू देऊ नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना अप्रत्यक्षपणे सुनावलं.
मुख्यमंत्री तुम्हालाच व्हावं लागेल. तरच हे सरकार नीट चालेल, असं शरद पवारांनी मला अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन होण्याआधी सांगितलं. मी त्यावेळी नकार दिला. मात्र पवारांनी विश्वास दाखवला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विश्वास दाखवला. आजही ते पाठिशी ठामपणे उभ आहेत. पण माझ्याच माणसांना मी नको असेन तर काय बोलणार? त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. फक्त त्या आमदारांनी मला प्रत्यक्ष येऊन ही गोष्ट सांगावी की तुम्ही आम्हाला या पदावर नकोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी चेंडू बंडखोरांच्या कोर्टात टाकला.
मला पदाचा मोह नाही. मी खुर्चीला चिकटून बसणारा नाही. तुम्ही या पदासाठी नालायक आहात, असं शिवसेना नेत्यांनी, शिवसैनिकांनी, ज्यांना मी आपलं मानतो, त्यांनी येऊन मला सांगावं. मग मी मुख्यमंत्रिपदच काय, पक्षप्रमुखपददेखील सोडेन, असं ठाकरे म्हणाले. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना कोविड काळात सरकारनं चांगलं काम केलं. मी त्यावेळी जनतेशी संवाद साधायचो. आपल्या कुटुंबातील कोणीतरी बोलतंय, असं त्यावेळी अनेकांना वाटलं. अनेकांनी ही भावना बोलून दाखवली. माझ्यासाठी ही बाब कोणत्याही पदापेक्षा कितीतरी मोठी आहे. कमावलेली माणसं हीच माझी संपत्ती आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं.