ठाकरे घराण्याला सत्तेचा, खुर्चीचा मोह नाही, हे अनेकदा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे सांगायचे. पण आज प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित केल्यानंतर अवघ्या २ तासांत वर्षा बंगला सोडला. शिवसेनेचा लढण्याचा इतिहास आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. आम्ही असत्याच्या विरोधात लढणारे लोक आहोत. शेवटी सत्याचा विजय होईल, असं संजय राऊत यांनी सांगून एकनाथ शिंदेविरोधातला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचंच एकप्रकारे अधोरेकित केलं. राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडताना आक्रमक पण त्याला भावनिकतेची जोड देऊन ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, असं सांगत शिवसेना भाजपबरोबर जाणार नसल्याचंच निक्षून सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावरुन निघतानाची दृश्य
उद्धव ठाकरे रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी होते. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला….. अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. शिवसैनिकांचं प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आलं. त्यांनी दोन्ही हात जोडून शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारलं. गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून ‘मातोश्री’च्या दिशेने निघून गेले.
ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडलं, मुख्यमंत्रिपद नाही, बहुमत सिद्ध करु, राऊतांनी निक्षून सांगितलं
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेयांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून विचारला होता. त्याच वेळी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री बंगल्यावर जाण्याची तयारीही ठाकरेंनी यावेळी दाखवली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासात मुख्यमंत्री वर्षा बंगला रिकामा करण्याची तयारी केली. परंतु ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडलं, मुख्यमंत्रिपद नाही, गरज पडल्यास विधिमंडळात बहुमत सिद्ध करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेना स्टाईलने सांगितलं.