मुंबई: एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे. गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक या हॉटेलच्या परिसरात धडकले. त्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबल्याने याठिकाणी आसाम पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये शिरता आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे आता राष्ट्रीय स्तरावरील मित्रपक्ष शिवसेनेला मदत करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळापासून शरद पवार, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे सातत्याने संपर्कात आहेत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन हॉटेलवर धडकत येथून शिवसेनेच्या आमदारांना निघून जाण्यास सांगावे, अशी मागणी केली.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरुवातीला सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. मात्र, मुंबई ते सूरत हे अंतर फार नसल्याने शिवसेनेच्यादृष्टीने बंडखोर आमदार हे काहीसे अ‍ॅक्सिसेबल होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरांना सूरतमधून हवाईमार्गे गुवाहाटीत आणण्यात आल होते. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची सरबराई केली जात आहे. याठिकाणी शिवसेना पोहोचण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदार काहीसे निश्चिंत होते. मात्र, आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर अचानक हल्लाबोल करत सर्वांनाच अचानक धक्का दिला.

यावेळी तृणमूल काँग्रेसच्या आंदोलकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने पूर पीडितांना एकाही पैशाचीही मदत केलेली नाही. त्याऐवजी भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना आसाममध्ये आणून घोडेबाजार सुरु केला आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
जे बाळासाहेबांना शक्य झाले ते उद्धव ठाकरेंना जमणार का? हिंदुहृदयसम्राट म्हणाले होते…

शिवसेनेची गळती सुरुच, आणखी सहा आमदार गुवाहाटीत?

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील काही जण गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे एकूण सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. पैकी तीन जण गुवाहाटीला पोहोचले आहेत. पोलीस सुरक्षेत हे आमदार हॉटेल रॅडिसन ब्ल्यूवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे स्वत: हॉटेलच्या लॉबीत उभे होते. या आमदारांच्या कार्सच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. मात्र या तीन आमदारांपैकी दोन जण मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे. माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर अशी त्यांची नावं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here