नवी दिल्लीः एअर इंडियाने ४ मेपासूनच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांचे बुकींग शनिवारपासून सुरू केले होते. देशातील वाढवण्यात आलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत असल्याने लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेने एअर इंडियाने तिकीट बुकींग सुरू केले. पण नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं सुरू करण्याचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. यामुळे सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही एअर लाइन्सने तिकीट बुकींग सुरू करू नये, असं पुरी यांनी स्पष्ट केलं.

एअर इंडियाने ४ मेपासूनच्या काही देशांतर्गत विमानांच्या उड्डाणांचे बुकींग सुरू केले होते. तसंच १ जूनपासूनच्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांसाठीही बुकींग सुरू करण्यात आले होते. यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय.

इंडिगोनेही केली होती घोषणा

४ मे पासून टप्प्या-टप्प्याने विमानांची उड्डाणं सुरू करण्यात येतील, असं काही दिवसांपूर्वी इंडिगोनेही म्हटलं होतं. वाढवण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपण्याच्या शक्यतेतून कंपनीने ही घोषणा केली होती.

रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे मिळणार

लॉकडाऊनदरम्यान बुकिंग केलेल्या तिकिटांचे पैसे रिफंड होतील किंवा रोख देण्यात येणार आहेत. तुम्ही २५ मार्च आणि ३ मेदरम्यानचे तिकीट बुक केले असेल तर त्याचा रिफंड क्रेडिट केला जाईल किंवा तुम्हाला रि-शेड्युल करता येईल, असं सांगण्यात आलं होतं. नंतर २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यानच्या बुकिंगचे कॅश रिफंड करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here