उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर परतल्यापासून त्यांनी प्रसारमाध्यमांशी कुठलाही संवाद साधलेला नाही. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सध्या मातोश्रीबाहेर तळ ठोकून आहेत. या सगळ्यांशी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुरुवारी मध्यरात्री अनौपचारिक संवाद साधला. आदित्य ठाकरे गुरुवारी मध्यरात्री अचानक मातोश्रीबाहेर आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासाठी बोलण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी आदित्य ठाकरे पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांना कॅमेरे बंद करण्याची विनंती केली आणि त्यानंतर मीडियाशी अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी एका पत्रकाराने आदित्य यांना उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले. यावेळी आदित्य यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतही विचारणा करण्यात आली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी त्यावर बोलणे टाळले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी काहीवेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि पुन्हा ‘मातोश्री’मध्ये निघून गेले.
‘… म्हणून मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हला झाला होता उशीर’
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी फेसबुक लाइव्ह करण्यापूर्वी प्रचंड भावूक झाले होते. ‘बस झाले, आता राजीनाम्याचा निर्णय जाहीर करून टाकतो’, असा मनोदय त्यांनी जाहीर केला होता. त्याचवेळी शिवसेनेतील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यासह अनेकांनी त्यांची समजूत काढून, ही लढाई इतक्यात संपणारी नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना फेसबुक लाइव्ह करण्यास अर्ध्या तासाहून अधिक काळ उशीर झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष भेटून, तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून ठाकरे यांना, ही लढाई लढण्यापूर्वीच शस्त्र ठेऊ नका, असा संदेश दिला होता. ‘काहीही झाले तरीही मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत.
कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या सभागृहात अविश्वास ठरावाचा सामना करण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही दिवसभरात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरीही संघर्षाची भूमिका ठाम आहे’, असे शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.