मुंबई: कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा सकाळपासून रंगली आहे. तेदेखील गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सामील होतील, असे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांच्या स्वीय सहाय्यकाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे सध्या चिपळूणमधील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. ते गुवाहाटीला निघून गेले, ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाने सांगितले. मात्र, गेल्या काही दिवसांतील शिवसेना आमदारांचा चमत्कारिक कारणं देऊन गायब होण्याचा पॅटर्न पाहता यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही. (Shivsena leader Eknath Shinde Revolt)

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांतील शिवसेनेचे आमदार गळाला लावले होते. मात्र, कालपर्यंत मुंबई आणि तळकोकणातील आमदार शिवसेनेच्या गोटात होते. परंतु, काल मुंबईतील मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आज भास्कर जाधवही नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढत आहे. एकनाथ शिंदे गटात आतापर्यंत जवळपास ४५ ते ५० आमदार दाखल झाल्याची माहिती आहे.
घरचे काम, नारळपाणी…; आमदारांनी शिवसेनेला दिलेल्या गुंगाऱ्याची सुरस कहाणी

‘माझ्यासोबत ५० आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४०पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here