मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडाच्या पाचव्या दिवशी आता निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडूनही त्यावर चकार शब्दही काढण्यात आलेला नाही. मात्र, पुढील काही तासांमध्ये या सगळ्या राजकीय नाट्यामागे भाजपचा सहभाग आहे की नाही, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या कमालीचे सक्रिय झाले असून ते अनेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. या भेटीगाठींबाबत गुप्तता बाळगली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी रात्री मुंबईबाहेर पडले होते. त्यानंतर आज सकाळी १० तासांनी ते मुंबईत परतले आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नक्की कोणाची भेट घेतली, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, भाजपकडून आजच एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सागर बंगल्यावर मित्रपक्षांची बैठक बोलावली जाईल, असे सांगितले जात आहे. परंतु, भाजपकडून अद्याप या माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही

देवेंद्र फडणवीस यांनी खरोखरच मित्रपक्षांच्या नेत्यांची भेट घेतल्यास ते यावेळी काय सूचना देतात किंवा राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत काही वक्तव्य करतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं बंड निर्णायक टप्प्यावर, आता उरले ‘हे’ दोनच पर्याय
एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना संबोधित करताना आपल्या पाठिशी एक मोठी राष्ट्रीय महाशक्ती असल्याचे म्हटले होते. ही राष्ट्रीय महाशक्ती म्हणजे भाजपच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, भाजपचा एकही नेता शिवसेनेतील बंडाविषयी बोलायला तयार नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून भाजपचे नेते यावर बोलणे टाळत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा गट लवकरच भाजपच्या सोबत जाऊन राज्यात नवे सरकार स्थापन करेल, अशी चर्चाही सुरु आहे. एकनाथ शिंदे गटाकडून येत्या काही तासांमध्ये याबाबत निर्णायक पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप पक्ष विशेषत: देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
‘गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं जातंय’
उद्धव ठाकरेंनी बोलावली ‘पॉवरफुल’ बैठक

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आज मुंबईत होईल. या बैठकीला उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहतील. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीला अनेक महत्त्वाचे अधिकार आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार, पक्षप्रमुख सर्वोच्च आहेत. कोणालाही पक्षातून काढण्याचा सर्वोच्च अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीकडे आहे. पक्षप्रमुख कार्यकारणीच्या सहमतीनं कोणत्याही नेत्याची हकालपट्टी करू शकतात.

शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत केवळ आमदार, खासदार नव्हे, तर जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुखांचाही समावेश आहे. २०१८ मध्ये २८२ सदस्यांकडून उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड झाली. सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत १४ सदस्य आहेत. पैकी ५ जणांची नियुक्ती पक्षप्रमुखांकडून करण्यात आली आहे. २०१८ मध्ये एकनाथ शिंदेंसह चौघांची ठाकरेंकडून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here