मुंबई: शिवसेनेविरोधात दंड थोपटणाऱ्या एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. थोड्याचवेळात सर्वोच्च न्यायालय बंडखोर गटाच्या १६ आमदारांना पाठवण्यात आलेल्या नोटीससंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल सुनावू शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे उपस्थित आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय निर्देश देतात, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे यांना दोनवेळा फोन केला होता. या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसेकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता मनसेप्रमुख राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा एखादा खळबळजनक निर्णय घेतात का, हे पाहावे लागेल.
आमदार फुटले, मंत्री फुटले, पण जिद्द कायम; मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरेंकडून शेवटपर्यंत लढण्याचे संकेत
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली?

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरश: खिळखिळी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांच्यात दोनवेळा फोनवर बोलणे झाले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे राज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याचे समजते. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

Eknath Shinde vs Shivsena: उद्धव ठाकरेंचा दणका, एकनाथ शिंदेंसह ९ बंडखोर मंत्र्यांची खातीच काढून घेतली
बंडखोर शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत पक्षापासून दूर झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. आम्ही ३८ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याने राज्य सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा या याचिकेत शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच विधानसभेत बहुमत चाचणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here