मुंबई: आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेतच आहोत याचा पुनरुच्चार शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्यापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं. आपण ज्या भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जावं. राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार यावं आणि हे सगळं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानं व्हावं, हीच आमची इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. केवळ १४-१५ आमदार सध्या आमच्यासोबत नाहीत. मात्र त्यांना आमच्यासोबत यावं लागेल. आम्ही काढलेला व्हिप त्यांना मानावा लागेल, असं केसरकर यांनी म्हटलं. आमचा गट म्हणजेच शिवसेना असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे जात आहोत. हिंदुत्त्वाच्या मार्गानं मार्गक्रमण करत आहोत, असं केसरकर म्हणाले.
पाठिंबा कोर्टात काढायचा नसतो,राज्यपालांना सांगायचा असतो, जयंत पाटलांनी शिंदेंना बेसिक सांगितलं
आता तुमचे नेते कोण? एकनाथ शिंदे की बाळासाहेब ठाकरे? असा सवाल केसरकर यांना विचारण्यात आला. त्यावर ठाकरेसाहेब पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्याबद्दल आजही आम्हाला आदर आहे. तर विधिमंडळात आमचे नेते शिंदे साहेब आहेत, असं उत्तर केसरकर यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही जण आता उद्धव ठाकरेंचे सल्लागार झाले आहेत आणि त्यांनी दिलेले सल्ले ठाकरे साहेबांना महत्त्वाचे वाटतात, याचं दु:ख वाटत असल्याचं केसरकर म्हणाले.

आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, अशी आमची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासूनची आहे. आता शिंदेंसोबत असलेल्या अनेकांनी ही बाब उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. त्यावर चर्चादेखाल झाली. मात्र बराच काळ चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवण्यात आलं. निर्णय झाला नाही. त्यादरम्यान या गटातील काहींना फोडण्याचे प्रयत्न झाले, असं केसरकर यांनी सांगितलं. आताही आम्ही हिंदुत्त्वाच्या मार्गानं पुढे जाण्याची मागणी करत आहोत. तर आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. समजूत काढण्याऐवजी धमक्या दिल्या जात आहेत. पातळी सोडून टीका होत असल्याचं केसरकर म्हणाले.
आम्ही पाडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अजित पवार ताकद देत, शंभूराज देसाईंची खदखद
उद्धव ठाकरेंनी ५ वर्षे मुख्यमंत्री राहावं, असं आम्हालाही वाटत होतं. पण परिस्थिती अशी आली की आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागला. आमच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी ताकद वाढवत आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये सत्तेत असलेले घटकपक्ष त्यांचे पुढचे आमदार घोषित करत आहेत. त्यांना ताकद दिली जात आहे. त्यांना निधी पुरवला जात आहे. मग अशा स्थितीत काम कसं करायचं, असा सवाल केसरकर यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here