मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्त्वालाच नख लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतान त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.

यावेळी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामागे कोणाचा दबाव आहे, सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे. पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस जगवण्यासाठी, त्याच्या विकासासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. गंभीर परिस्थितीमध्ये भावाने भावाच्या सोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना वाटत असल्याचे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना आणि मनसेच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
रुग्णालयातून परतल्यानंतर सक्रिय झालेल्या राज्यपालांचा ठाकरे सरकारला पहिला धक्का
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ५६ आमदार निवडून आले होते. त्यापैकी मुंबईतील आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर आमदारांची संख्या ५५ इतकी झाली होती. एकनाथ शिंदे यांनी यापैकी तब्बल ४० आमदार फोडून स्वत:सोबत नेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात एकनाथ शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास शिवसेनेच्या अस्तित्त्वालाच नख लागेल. त्यामुळे आता आता उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनवेळा फोन

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरश: खिळखिळी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांच्यात दोनवेळा फोनवर बोलणे झाले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे राज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याचे समजते. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
…तर स्वत: एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची भेट घेतील; केसरकरांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट
अशातच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक सूचक ट्विट करून ही उत्कंठा आणखीच वाढवली आहे. अमेय खोपकर यांनी सोमवारी रात्री एक ट्विट केले होते. यामध्ये म्हटले होते की, ‘असा हा ‘धर्मवीर’… एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है!’. राजकीय वर्तुळात अमेय खोपकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. खोपकर म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडनाट्यात आगामी काळात खरंच राज ठाकरे यांची काही भूमिका असू शकते का, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here