कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागांत पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. २० एप्रिल म्हणजेच आज ही ट्रेन ओखा वरून रवाना झाली आहे. २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन रत्नागिरीला, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवलीला, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगावला, तर ९ वाजून १० मिनिटांनी उडुपी येथे पोहोचणार आहे. तर २४ एप्रिलला ही ट्रेन तिरुवअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उडुपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे. व्यापारी, उत्पादक, आंबा बागायतदार या ट्रेन मधून आपल्या मालाची ने आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात या करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोकण रेल्वेने पहिल्या दिवसापासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पार्सल ट्रेनच्या निमित्ताने कोकण रेल्वेने छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि बागायतदारांना मदतीचा हात दिला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines