एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून घेतली. मात्र यावेळी राज्यपाल महोदय चिडले नाहीत, ओरडले नाहीत, रागावले नाहीत, त्याचं काय कारण असावं, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्याचं कारण मागील ठाकरे सरकारमधील दोन-तीन मंत्र्यांनी शपथ घेतावेळी अशीच स्मरुन शपथ घेतली होती. त्यावेळी मात्र राज्यपालांनी भर मंचावरुन नाराजी व्यक्त केली होती. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या के सी पाडवी यांना तर सुनावलं होतं.
एकनाथ शिंदे यांची वेगळ्या प्रकारे शपथेला सुरुवात
एरवी कोणतेही मंत्री शपथ घेताना राज्यपालांनी ‘मी’ म्हणून निर्देश दिल्यानंतर त्यापुढे त्यांचं नाव घेऊन शपथ घेत असतात. पण एकनाथ शिंदे यांनी यांनी असं न करता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… या शब्दांनी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ पूर्ण घेतली.
फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शपथेवर आक्षेप घेतला होता!
देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभेत ३० नोव्हेंबर २०१९ रोजी भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथेवर आक्षेप घेतला होता. आपल्या संविधानात कशा प्रकारे शपथ घ्यावी याचा नमुना दिला आहे. ज्या क्षणी राज्यपाल मी म्हणतात, त्यानंतर आपलं नाव संबंधित मंत्र्यांनी घ्यायचं असतं आणि शपथेला सुरवात करायची असते, असं सांगत उद्धव ठाकरे यांचा शपथविधी असंविधानिक असल्याचा आक्षेप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना घेतला होता.
त्यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाबाहेरील मुद्दा उपस्थित करता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस या सभागृहात संविधानावर बोलायचा अधिकार आहे की नाही? असा सवाल केला होता. या सभागृहात संविधानावर बोलायचा अधिकार नसेल तर मी सभागृहात बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.
माननीय राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर विहीत नमुन्यात शपथ घेतली तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते, अन्यथा ती शपथ ग्राह्य धरली जात नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शपथ चुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथ घेतली होती. मी याकरीता पॉईंट ऑफ प्रोसिजरवर घेत होतो कारण मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानाप्रमाणं नव्हती, असा आक्षेप त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी घेतला होता.