मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची दुपारी १२ वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु झाली. त्यानंतर ते ईडी कार्यालयाबाहेर आले. दरम्यान, मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र, गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण ९ विकासकांना तब्बल ९०१ कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली १३८ कोटींची माया जमा करण्यात आली. मात्र, यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल १०३९.७९ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात १०० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या १०० कोटींपैकी ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं आहे.