अमरावती: व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण खून झाला. कोल्हे यांच्या खूनामागे नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला. कोल्हे यांच्या कुटुंबीयांची खासदार नवनीत राणांनी भेट घेतली. या घटनेतील आरोपींवर कारवाई व्हावीच. मात्र त्यासोबतच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे अमरावतीचे पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री यांचीही चौकशी व्हावी, असं राणा म्हणाल्या.
अमरावतीत घडणाऱ्या वाढत्या गुन्हेगारी घटना हे पोलीस आयुक्तांचं अपयश आहे. काही महिन्यांपूर्वीच अमरावतीत दंगल झाली, कर्फ्यू लागला, दगडफेक, मारहाण झाली. या सगळ्या हिंसक घटना पोलीस आयुक्तांचं अपयश आहे. आताही काहींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सगळ्याचा विचार व्हायला हवा, असं राणा यांनी म्हटलं.