मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर शिवसेनेकडून बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या बंडखोर आमदारांसह भाजप नेत्यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना सांगितलं की लोकशाहीतला दुसरा आवाजही ऐकला पाहिजे. म्हणून माझी खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून मी दुसरा आवाज आहे, माझेही काही शब्द, जे आवडो ना आवडो ते तुम्ही ऐकून घ्यावेत,’ असं म्हणत भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि एकामागोमाग एक मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.

‘एकनाथ शिंदे, तुम्ही ज्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करता..त्या भाजपने शिवसेनेच्या संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी काय काय केलं? आता संजय राठोडांचं ते काय करणार आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर ईडीची चौकशी लावली. पण नियती कोणालाही सोडत नाही. ज्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी टाकल्या आज त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन त्यांना वाचवावं लागतंय, ही वेळ भाजपवर आली,’ अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे काय होणार? फडणवीस स्पष्टच बोलले

भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. यावर उत्तर देताना जाधव म्हणाले की, ‘वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. या सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावत आहात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेतले आहेत. प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, पडळकर, सुजय विखे, प्रसाद लाड, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंदडे, वैभव पिचड, कालिदास कोळंबर… किती जणांना धुवून घेणार?’ असा सवाल जाधव यांनी भाजपला विचारला आहे.

सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तुमची कृती सरकार पाडण्यासाठी होती. करोनासारखं संकट आलं, या संकटात सत्ता कोणाची आहे हे विसरुन राज्याला त्यातून बाहेर काढण्याचा आपला इतिहास आहे. पण तुमची कृती सरकार पाडण्याची होती. तुम्ही कधी कुणाच्या हातात भोंगा दिला, तर कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिली. कधी नुपूर शर्मा, तर कधी सुशांतसिंह महाराष्ट्रात आणला. सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला, पण सत्ता उलटली नाही, असंही भाजपला उद्देशून भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here