रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने एक क्षण ही विश्रांती घेतली नसल्याने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रेनकोट आणि छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.तर दुसऱ्या बाजूला धरण क्षेत्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.गेल्या सात तासांमध्येच राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ७ फुटांनी वाढ झाल्याने यंत्रणा देखील हायअलर्टवर गेली आहे.
यापूर्वी तीनवेळा महापुराचा सामना केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुरसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने काल सोमवार सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणातून क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून गेल्या ७२ तासात ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तर कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ झाली असून काल रात्रीच्या आठ वाजताच्या सुमारास हा बंधारा देखील पाण्याखाली गेला. आज सकाळी येथील पाणी पातळी २४ फुटांवर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाटाने होणारी वाट पाहता प्रशासन सध्या हाय अलर्ट वर केली असून प्रशासनाकडून तत्काळ हा बंधारा वाहतुकीसाठी बंद केला करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दूरध्वनी क्रमांक जारी:
दरम्यान हवामान खात्याकडून आठ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांकसह दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. नागरिकांना काही आपत्ती आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक १०७७ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग: ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४