आसाममधील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कोठून आला? या बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरविला गेला नाही तर आणखीही बरेच काही दिले गेले आहे. या सर्व गोष्टी कोठून आल्या?, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. आणखीही काही म्हणजे काय?, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. काय नाही, मला काय म्हणायचे आहे ते सर्वांना समजले आहे, अशी मोघम टिप्पणी ममता बॅनर्जी यांनी केली.
तसेच ममता बॅनर्जी यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे बेकायदा आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली तरी महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, असे ममता यांनी म्हटले.
‘पुढचे ६ महिने सरकारला धोका नाही, हा केवळ भ्रम’
‘बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील,’ असा दावा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे. ‘शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. १०६ आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गर्भितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहेत, पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल. शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे’, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.