मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईसह, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी यलो अलर्ट तर ठाणे आणि पालघर व लगतच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इतकंच नाहीतर, समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांना आज समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज दुपारी ४.३२ वाजता मुंबईत ३.९४ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे. तर १३ फुटांवर लाटा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि लगतच्या भागात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे रेल्वे ट्रॅकसह अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्त्यावर गाड्यांची वाहतूक मंदावली तर यामुळे प्रवाशांनाही फटका बसला.

रत्नागिरीत पावसाचे रौद्ररुप! जगबुडीने ओलांडली धोका पातळी, अर्जुना धरणाचा कालवा फुटला
मुंबईतल्या पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स…

– वसई विरार शहरामधे रस्ते जलमय झाले आहेत. एक ते दोन फुटांपर्यंत पाणी आलं आहे

– दादर परिसरात मुसळधार पाऊस सुरू

– ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

– मुंबईतील दहिसर परिसरात तलावात एकाचा बुडून मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

– मुंबईत ५ दिवसांत जुलैच्या सरासरीच्या जवळपास ७०% पाऊस झाला

– मुसळधार पावसानंतर पवई तलाव ओसंडून वाहत आहे

– मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; आज जोरदार पावसाचा इशारा

भय इथले संपत नाही! खेडमध्ये घरावर दरड कोसळली, एका क्षणात उद्ध्वस्त झालं कुटुंब
कुठे आहे पावसाचा इशारा?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक या शहरांमध्ये ८ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटामाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, राजापूर तालुका परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक पिके वाहून गेली आहेत. राजापूरचे अनेक भाग पुरामुळे पाण्याखाली गेले असून, पाऊस सुरू राहिल्यास स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर…

अशात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही याचीही खात्री केली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने दोन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथके महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेल्या राज्यभरातील ३,५०० हून अधिक लोकांना पूरप्रवण आणि संवेदनशील ठिकाणांवरून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

खड्ड्यामुळे तोल गेला अन् मागून येणाऱ्या एसटी बसने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here