अहमदनगर : शिवसेनेत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर आता इतर पक्षांनी दक्षता घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘आगामी काळासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा आणि काँगेसची एकजूट दाखवून द्या,’ असं आवाहन थोरात यांनी केले. यावेळी थोरात यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही कौतुक केलं आहे.

संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात थोरात बोलत होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्तांतरानंतर तालुक्यात झालेला हा पहिलाचा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात थोरात काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक मंत्रिपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असं काम केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा याचबरोबर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला. यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले,’ असंही थोरात म्हणाले.

नाराज आढळराव पाटील ‘मातोश्री’वर, ठाकरेंशी भेटीत दिलजमाई की जय महाराष्ट्र?

‘सत्ता येते आणि जाते, पण…’

‘काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आणली. या सरकारच्या काळात करोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना २ लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले. सत्ता येते आणि जाते, पण जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. आगामी काळामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांची गौरवास्पद वाटचाल अशीच सुरू ठेवून सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रहावे आणि आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील, त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे, असं आवाहनही थोरात यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here