अहमदनगर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला कार्यकर्ता संवाद मेळावा अहमदनगर जिल्ह्यात होत आहे. रविवारी (१० जुलै) शरद पवार नगरला येणार आहेत. आतापर्यंतच्या राजकारणात पवार यांनी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपने नगर जिल्ह्याची जबाबदारी यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. अलिकडेच नगरच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा आपण लवकरच नगरला येणार असल्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते. त्याआधीच आता पवार नगरला येत आहेत.

औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादला जाताना ते नगरमध्ये थांबणार आहेत. रविवारी १० जुलैला सकाळी साडे अकरा वाजता नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

सत्ता गेल्याचे वाईट वाटण्यात अर्थ नाही

फाळके म्हणाले, की ‘सत्तांतरानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. राज्यात सत्ता येणे अशक्यप्राय असल्याच्या काळात पवार यांनी ती खेचून आणली होती. त्यामुळे आता ती सत्ता गेल्याचे वाईट वाटण्यात काही अर्थ नाही. असे असले तरी आता पुढील तयारी काय करायची, पक्षाची काय ध्येय धोरणे असतील, याबद्दल पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.’

हेही वाचा : Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस कॅबिनेटमधील मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हेही या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. आतापर्यंतच्या राजकारणात पवार यांनी नगर जिल्ह्याला विशेष महत्व दिल्याचे आढळून येते.

नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून भाजपच्या कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरूच आहे. यामध्ये पवार यांचे राजकीय विरोधक भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. शिवाय कर्जत-जामखेडमधील भाजपचे दुसरे नेते प्रा. राम शिंदे विधान परिषदेवर विजयी झाले आहेत. मंत्रिपदासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पवार यांचा संवाद होत आहे.

हेही वाचा : ‘१० जन्म घेऊनही त्यांच्यावरील उद्धवजींचे उपकार फिटले नसते’; बंडखोर आमदाराची गुलाबरावांवर टीका

फडणवीसही लवकरच येणार

भाजपनेही नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी नगर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून जिल्ह्याकडे मी विशेष लक्ष देणार आहे. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक वाढ करून राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीतजास्त विकास कामे करण्याची जवाबदारी माझ्यावर आहे. लवकरच नगर जिल्हा दौरा करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, मिलिंद गंधे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का: १८ वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर; भगीरथ भालकेंच्या पॅनलचा धुव्वा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here