जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निवडणुकीच्या प्रचारात असताना हत्या झाल्यामुळे भारताने उमदा आणि विश्वासू मित्र कायमचा गमावला आहे. आबे हे जपानचे सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान होते. दोन वर्षांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पदत्याग केला असला तरी ते आजही जपानमधील सर्वांत लोकप्रिय आणि महत्त्वाचे नेते होते. जपानमध्ये बंदुका किंवा रायफली बाळगण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना अगदी क्वचित होते. वर्षभरात गोळीबार होऊन साऱ्या देशात आठ-दहा व्यक्तींनाही प्राण गमवावे लागत नाहीत. या पार्श्वभूमीवर आबे यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर ४१ वर्षांच्या संशयिताने ‘त्यांची धोरणे आवडत नसल्याबद्दल’ त्यांना गोळ्या घालाव्यात, ही विचित्र आणि मोठ्या कटाकडे अंगुलिनिर्देश करणारी दुर्घटना आहे. आबे हे त्यांच्या घराण्यातील तिसरे उच्चपदस्थ. त्यांचे आजोबा जपानचे पंतप्रधान होते. वडील परराष्ट्रमंत्री होते आणि स्वत: आबे यांनी पोटाच्या विकाराने पद सोडले नसते तर तेही आज पंतप्रधान असते. गेल्या दोन दशकांमध्ये जगभरात जगाची चिंता करण्याआधी आपल्या देशाच्या अर्थकारणाची काळजी करणाऱ्या ‘राष्ट्रीय विचारांच्या’ नेत्यांचा उदय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प, शिंजो आबे यांची नावे यात घेता येतील. इतरही अनेक नावे जोडता येतील. या विचारांतूनच जपानच्या स्वभावात नसलेला आक्रमकपणा शिंजो आबे यांच्या धोरणात दिसत असे. जपानचा अडकून पडलेला आर्थिक वृद्धिदर वाढविणे किंवा राष्ट्राच्या अर्थकारणातील महिलांचा सहभाग वाढविणे, अशा त्यांच्या विचारांचा उल्लेख ‘आबेनॉमिक्स’ असा होत असे. ते स्वत: महिलांविषयीच्या त्यांच्या धोरणांचा उल्लेख ‘वूमनॉमिक्स’ असा करीत असत. दुसऱ्या महायुद्धातील जबरदस्त फटक्यानंतर जपानने दीर्घकाळ परराष्ट्र धोरणाबाबत अमेरिकेचे आश्रितपण पत्करले. इतकेच काय तर, आपल्या संरक्षणाची जबाबदारीही पश्चिमेवर सोपवून देश पुन्हा उभारण्यावर भर दिला. आबे यांनी जागतिक राजकारणातील जपानचे अस्तित्व पुन्हा स्पष्टपणे अधोरेखित केले. ही त्यांची कामगिरी पुढची अनेक दशके विसरता येणार नाही. जपान हा महत्त्वाचा देश आहेच; पण मित्रांची साथ घेऊन तो एक जागतिक महाशक्ती उदयाला घालू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्या नेतृत्वात होता.

भारत आणि जपान हे दीर्घकाळ परस्परांचे नैसर्गिक मित्र आहेत. या मैत्रीला बौद्ध धर्माचा वारसा, सुभाषबाबूंचे युद्धकारण आणि इतरही कारणे आहेत. या मैत्रीचा वारसा आबे यांनी खूपच पुढे नेला. आधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातच ही मैत्री अधिक बहरू लागली. पुढे नरेंद्र मोदी यांच्या काळात तर तिने अनेक नवी शिखरे गाठली. यात या दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत स्नेहसंबंधांचाही मोठा वाटा आहे. ट्रम्प, आबे आणि मोदी यांचे सूर परस्परांशी जुळले होते. आबे यांना ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका या चार प्रमुख देशांची ‘क्वाड’ ही संघटना पुनरुज्जीवित करण्यात जे यश आले, त्यामागेही या व्यक्तिगत स्नेहाचा वाटा होता. हे चार देश उघडच चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, या चारही देशांपैकी आबे यांनी आपला चीनविरोध कधीही लपवला नाही. सारे जग कनवटीला लावण्याच्या चीनच्या आसुरी आकांक्षेला पायबंद घालायचा तर हे चार प्रमुख देश कायम एकत्र राहिले पाहिजेत, हा आबे यांचा आग्रह जगाच्या राजकारणावर पुढची अनेक दशके प्रभाव टाकणार आहे. ही त्यांची कामगिरी कधीही विसरता न येणारी आहे.

आबे यांच्या कार्यकाळात विविध योजनांच्या रूपाने मदतीचा तसेच द्विपक्षीय करारांचा ओघ सुरू झाला, त्यात अर्थातच जपानचे अर्थकारण सावरण्याचा विचार होता. जपानमधील व्याजदर उणे होत असताना देशातील प्रचंड निष्क्रिय भांडवल कुठेतरी गुंतविणे आवश्यक होते. मात्र, हे करताना आबे यांनी भारताला प्राधान्य दिले. भारतात होऊ घातलेली पहिली बुलेट ट्रेन हे अशा सहकार्याचे एक उदाहरण आहे. आबे यांना जपानचे अर्थकारण पूर्ण सावरता आले नाही. मात्र, उत्पादकता वाढविणे, लालफीतशाही कमी करणे, घटती लोकसंख्या हे वरदान समजून कल्पक धोरणे आखणे.. असे सारे उपाय त्यांनी योजले. त्यांच्या कार्यकाळात सन २०१५ ते २०१७ या वर्षांमध्ये जपानने लागोपाठ आठ तिमाहींमध्ये निव्वळ विकास नोंदविला होता. त्याआधीच्या सलग तीन दशकांमध्ये असे कधीही झाले नव्हते. देशांतर्गत धोरणे आणि परराष्ट्र संबंध या दोन्ही आघाड्यांवर सतत यश मिळविणाऱ्या आबे यांनी प्रकृतीचे कारण देऊन सक्रिय राजकारण सोडावे, याचे साऱ्या जगाला नवल वाटले होते. मात्र, फुमिओ किशिदा यांच्याकडे सूत्रे सोपवून आबे राजकारणाच्या धकाधकीतून बाहेर पडले होते. तरीही, सत्ताधारी पक्षाचे ते आधारस्तंभ होते. तो आता निखळला आहे. भारताचा हात हातात घेऊन एकविसाव्या शतकातील नव्या, लोकशाही जगाचे स्वप्न पाहणारा द्रष्टा मित्र आता कायमचा हरपला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here