एकाचवेळी ५० आमदार सत्तेतून बाहेर पडतात ही साधीसुधा घटना नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची नोंद संपूर्ण देशानं घेतली. जगातील ३३ देशांनी याची नोंद घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पंढरपूरमधील सभेत बोलत होते.

हायलाइट्स:
- आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- शिंदे
- 50 आमदारांचं बंड ही ऐतिहासिक घटना- शिंदे
- पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण
माझ्यासोबत ८ ते ९ मंत्र्यानी सत्ता सोडली. शिवसेनेचे ४० आमदार सरकारमधून बाहेर पडले. १० अपक्षांनी साथ दिली. इतके आमदार, मंत्री एका माणसावर विश्वास टाकतात ही साधी गोष्ट नाही. त्याचा विचार होण्याची गरज आहे. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असं शिंदे यांनी म्हटलं. आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आमदारांवर मी कोणत्याही प्रकारची आच येऊ देणार नाही. त्यांचं नुकसान होऊ देणार नाही. माझ्यासोबत राहून त्यांचं नुकसान होतंय असा विचार जेव्हा माझ्या मनात येईल, तशी वेळ आलीच तर मी टोकाचं पाऊल उचलेन. पण त्यांना तोशीस लागू देणार नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.
आम्ही काळजावर दगड ठेवून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर तेव्हा प्रचंड टीका झाली. आजही होत आहे. पण आम्ही त्यांना कामातून प्रत्युत्तर देऊ. मी कमी बोलतो आणि जास्त बोलतो. सभागृहातलं माझं भाषण अनेकांनी ऐकलं असेल. त्यातही मी फार कमी बोललो आहे. वेळ पडलीच तर सगळं बोलेन, सगळ्याच गोष्टी सांगेन, असं शिंदे म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात घडलेल्या गोष्टींवरही शिंदेंनी भाष्य केलं. स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान होऊनही आम्हाला सत्तेत असल्यानं गप्प राहावं लागत होतं. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यांसोबत काम करावं लागत होतं. शिवसैनिकांचं खच्चीकरण सुरू होतं. अनेकांना तडीपार करण्यात आलं. काहींवर तर मोक्का लागला आणि हे सगळं आपलंच सरकार असताना घडत होतं. त्यामुळेच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमची लढाई सोपी नव्हती. मात्र आमदारांनी विश्वास दाखवला. त्यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं शिंदे म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network