राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी गेल्या काही दिवसांत बहुसंख्य भागांमध्ये पावसाने कहर करायला सुरुवात केली आहे. राज्यभरात पावसामुळे आत्तापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. यापैकी नऊ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला आहे.

मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी काढलेल्या पत्रकानुसार, गडचिरोलीशिवाय मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि आसना नदीच्या काठावर वसलेल्या शेजारील नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत रेड अलर्ट जाहीर केला आहे. यासोबतच महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यादरम्यान लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network