मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींपासून काहीसे दूर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून एक नवे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकातून राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचा बुधवारी होत असलेला मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी प्रत्यक्षात आणता येणे अवघड आहे. त्यामुळे आपण उद्या होणारा मेळावा पुढे ढकलत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिपद देण्यास रामदास आठवलेंचा विरोध, म्हणाले….
राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पूर आलेल्या भागात मदतकार्य हाती घ्या, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली – कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here