नवी दिल्ली: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील बंडखोरांपैकी तुरळक अपवाद वगळता इतर जण निवडून येणार नाहीत, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या, याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. ते बुधवारी दिल्लीत ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनशी बोलत होते.

यावेळी दीपक केसरकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादीने आगामी निवडणुका एकत्र लढवाव्यात, असा आग्रह धरणाऱ्या शरद पवार यांचा समाचार घेतला. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने राज्यपालांना शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असल्याचं पत्र दिलं आहे. यामध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाऊ नये, असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे मत दीपक केसरकर यांनी मांडले.
‘डॉक्टरांनी सांगितलं होतं, ‘तुमच्याकडे शेवटचे सहा महिने उरलेत’; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते. कारण, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्यही दीपक केसरकर यांनी केले. त्यामुळे आता यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

मातोश्री कधीही सिल्व्हर ओकच्या दारात गेल्याचं मी पाहिलेलं नाही. बाळासाहेबांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं कधीही मान्य नव्हते. माझ्या पक्षात मी शेवटचा माणूस राहिलो तरी मी काँग्रेससोबत जाणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यामुळे शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

‘मुख्यमंत्री शिंदे एक क्षणही वाया जाऊ देत नाहीत’; शरद पवारांचा शिंदेंना मिश्कील टोला
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या ४० आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here