मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. नांदेड मुंबई नॅशनल हायवे ३६१ वरील गंगाखेड ते परळी दरम्यान असलेल्या शिवाजीनगर तांडा येथे नदीला पूर आल्यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
नॅशनल हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या
पुलावरून पाणी वाहत असल्याने नॅशनल हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली असल्यामुळे नागरिकांनी सोनपेठ, सळेगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आपल्या जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून पाण्यातून वाहने घेऊन जात आहेत.
पुलाचे काम सुरू
गंगाखेड ते परळी दरम्यान असलेल्या शिवाजीनगर तांडा येथे नॅशनल हायवे ३६१ नवीन पूल निर्मितीचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी पूल सुरू करण्यात आला आहे. हा पर्यायी पूल पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक बंद झाली आहे. पुलाची उंची कमी असल्याने यापुढे देखील या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.