Thane Monsoon 2022 : ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपरच्या खाडीमधील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेकडील खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी साचले असून महापालिकेकडून नागरिकांना घरं खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हायलाइट्स:
- कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपरच्या खाडीमधील पाण्याची पातळी वाढली
- कल्याण पश्चिमेकडील खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी साचले
- महापालिकेकडून नागरिकांना घरं खाली करण्याच्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस पडत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे काळू नदी आणि उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली खाडीमधील पाण्याची पातळीत देखील वाढ झाली आहे. काळू नदी आणि उल्हास नदी खाडी जाऊन मिळतात आणि खाडीत भरती आल्याने खाडीमधील पाण्याची पातळीत वाढ झालेली दिसते. बुधवारी दुपारी कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपरच्या खाडीमधील पातळी वाढली त्यामुळे कल्याण पश्चिमेकडील खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी साचले असून महापालिकेकडून नागरिकांना घरं खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डोंबिवली पश्चिमेला खाडी किनारी असलेला गणेश घाट हा सुद्धा पाण्याखाली गेला आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधर पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांमधून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. याच नदीकिनारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाण्याची पातळी वाढल्यास हे केंद्र बंद करण्याची वेळ येते. आता इशारा पातळीपासून धोका पातळी अवघे काही सेंटीमीटर असल्याने पाणी पातळी अशीच वाढल्यास हे केंद्र बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे संपूर्ण बदलापूर शहर आणि अंबरनाथ शहराच्या काही भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra thane monsoon news rain increase in water level of kalyan dombivali creek water seeped into the house
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network