आमदार दीपक केसरकर हे काही अंतर्ज्ञानी नाहीत किंवा त्यांना पवार साहेबांनी काय सांगितलं हे माहिती नाही. पण राजसाहेब त्यांचे निर्णय घेण्यासाठी कायमच सक्षम राहिले आहेत. त्यामुळे राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडण्यात पवार साहेबांची मदत किंवा आशीर्वाद वगैरे असण्याचं काही कारण नाही. पण राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडले त्याला आत्ताचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. हे मात्र नक्की ! असं योगेश खैरे म्हणाले आहेत.
दीपक केसरकर काय म्हणाले ?
शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचे दीपक केसरकर म्हणाले आहेत. तर छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा
दीपक केसरकर यांच्या दाव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून मनसे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील दीपक केसरकर यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. “अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरुद्ध? एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.