शिवसेना आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. एक दोन आमदार आले असते तर ठीक पण पन्नास आमदार काही मागणी नसताना येतात, माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
…तर राजकारण सोडेन
“विरोधकांनी कितीही वेळा सांगू द्या, बंडखोर आमदार निवडून येणार नाही. पण मी ठणकावून सांगतो, एकही आमदार पडणार नाही आणि ५० मधला एकही आमदार पडला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“ज्यावेळी बंड केलं, त्यावेळी मी राजकीय आत्महत्या केली, असं अनेक जण सांगत होते. पण मी नेमकं काय करतोय, याची मला पूर्णपणे जाणीव होती. बंडावेळी मी ३ दिवस आणि ३ रात्र झोपलो नव्हतो. माझ्या राजकीय करिअरची मला अजिबात भीती नव्हती, कारण मी ५० आमदारांच्या भवितव्याची चिंता केली होती, असंही शिंदे म्हणाले.
संभाजीनगर बाळासाहेबांच्या मुखातून निघालंय, नामांतराला स्थगिती नाही
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिल्यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आपण नामकरणाला स्थगिती दिलेली नाही, संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालंय, त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट बैठक घेऊन संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.