पुणे : मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे मोसे खोऱ्यातील लवासा सीटीजवळ असणाऱ्या दासवे पडळघर वस्ती येथील दासवे, आडमाळ ते पानशेत, वरसगाव हा संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. मात्र या मार्गावरून कोणतीही वाहतूक सुरू नसल्याने जीवितहानी झाली नाही.
रस्त्याची दुरुस्ती वेळेत झाली असती तर आज रस्ता वाहून गेला नसता, अशा भावना आता नागरिकांकडून व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे नागरिकांकडून सांगितलं जात आहे. अनेकदा सांगूनही बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आजही ही घटना घडली आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे आसपासच्या गावातील नागरिकांना आता दळणवळणासाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे.