खरंतर जेव्हा आलिया आणि रणबीर यांनी सोनोग्राफी सेंटरमधला तो खास फोटो शेअर करत लवकरच आमचं बाळ येणार आहे अशी बातमी दिली तेव्हापासूनच कपूरांच्या पाचव्या पिढीतल्या नव्या चेहऱ्याची उत्सुकता लागली आहे. ही बातमी ऐकून काही चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला तर काही नेटकऱ्यांनी, इतक्या लवकर बाळाची घाई कशी काय केली असं म्हणत ट्रोलही केलं. पण आता रणबीरने बाळासाठी इतकी घाई का केली त्याचं कारण सांगितलं आहे. एका मुलाखतीत रणबीरने लग्नानंतर लवकर चान्स का घेतला हे सांगितलं तेव्हा त्याचं म्हणणं खरच पटण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.
सध्या रणबीरचं वय ३९ वर्षे आहे तर आलिया २९ वर्षांची आहे. रणबीर आणि आलिया यांच्यात दहा वर्षांचं अंतर असूनही त्यांच्यातील केमिस्ट्रीने दोघांमध्ये प्रेम फुलवलं. ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ही जोडी प्रेमात पडली. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर १४ एप्रिलला रणबीरच्या वास्तू अपार्टमेंटच्या बाल्कनीत दोघांनी लग्नं केलं होतं.
रणबीर आणि आलिया लग्नानंतर खुश होतेच पण आता आईबाबा होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. हातात नवे सिनेमे असताना, काही सिनेमांचं शूटिंग सुरू असताना बाळाचा विचार इतक्या लवकर करण्यासाठी वय हे कारण रणबीरनं सांगितलं आहे. रणबीर म्हणाला, दोन महिन्यात मी ४० वर्षांचा होणार आहे. मला जर माझ्या मुलगा किंवा मुलगीसोबत मनसोक्त खेळायचं असेल, त्याच्यासोबत ट्रेकिंगला जायचं असेल तर मी तेव्हा फिट असायला हवं. हाच विचार करून मला लग्नानंतर बाळासाठी फार वाट बघायची नव्हती.
रणबीरचा शमशेरा सिनेमा २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक करण मल्होत्रा यालाही रणबीरने अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं की त्याला लवकरात लवकर बाबा व्हायचं आहे. इतकच नव्हे तर करणने त्याला बाळ झाल्याची बातमी रणबीरला सांगितली होती तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया हीच होती की, मी पण लवकरच बाबा होईन.