कपूर घराण्यातील चौथ्या पिढीचा चेहरा म्हणून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राज कपूरचा नातू, ऋषी कपूरचा मुलगा अशी ओळख घेऊन रणबीर मोठ्या पडद्यावर झळकला. २००७ मध्ये आलेल्या सावरिया या सिनेमाने रणबीरला सिनेमांच्या दुनियेत आणलं. हा सिनेमा फारसा चालला नाही पण रणबीरचं कौतुक झालं. त्यानंतर रणबीरने अभिनयात त्याचं नाणं वाजवलं आणि आज तो आघाडीचा अभिनेता आहे.
रणबीर अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने रणबीरला एक खास सल्ला दिला होता. आता रणबीर अभिनयात येण्याआधी आमिरच्या गाठीशी बराच अनुभव होता. त्यातूनच मिस्टर खान याने कपूरांच्या लेकाला एक गोष्ट सांगितली. पण नेमकं रणबीरने तो सल्ला ऐकला आणि सोडून दिला. हा प्रसंग घडल्यापासून पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. आता रणबीरचा शमशेरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर आमिर खान लाल सिंग चढ्ढा या सिनेमातून भेटायला येणार आहे. या वळणावर रणबीर आणि आमिरची भेट झाली तेव्हा रणबीरला तो सल्ला आठवला, इतकच नव्हे तर आमिरचा तो सल्ला ऐकायला हवा होता असं म्हणत रणबीरने पश्चाताप व्यक्त केलाय.आमिर रणबीरला असं म्हणाला होता की, अभिनय क्षेत्रात आल्यानंतर पहिल्या काही दिवसात सगळा भारत देश फिरून ये. रणबीरनेच हा किस्सा शेअर केलाय.
रणबीर म्हणाला, आमिरने असंही सांगितलं होतं की मी ज्या कुटुंबातून आलो आहे त्या कुटुंबाची एक लाइफस्टाइल आहे. बॉलिवूडमध्ये मला यश मिळणारच आहे, त्यामुळे भविष्यात भटकंतीसाठी वेळ मिळणार नाही, त्यामुळे आत्ताच बॅग भर आणि देश पालथा घाल. पण हो, भटकंतीसाठी बस किंवा ट्रेननेच जा. या प्रवासात माणसांना भेट, त्यांना जाणून घे. देशातील संस्कृती बघ. लोक कसे राहतात, कसे जगतात, त्यांना सिनेमातून काय बघायचं आहे ते जाणून घे. पण मी मात्र तो सल्ला ऐकला नाही, जर मी तो सल्ला ऐकला असता तर आज माझ्या विचारात वेगळी ताकद असती. रणबीर म्हणतोय की सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने जग फिरलोय पण आमिरच्या सल्ल्यानुसार जर मी देश पाहिला असता तर माझ्यातील क्रिएटिव्हीटीच्या कक्षा रूंदावल्या असत्या.
रणबीर कपूर सध्या शमशेरा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दंग आहे. २२ जुलैला शमशेरा रिलीज होणार आहे. तर आमिर खानच्या लाल सिंग चढढा या सिनेमाचीही प्रचंड उत्सुकता आहे. आमिरच्या पीके सिनेमात रणबीरने पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती.