jalgaon tourist, नदीत मधोमध अडकले ९ पर्यटक: अचानक पाण्याचा प्रवाहही वाढला; थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन – jalgaon district administration succeeded in rescuing 9 tourists stuck in the suki river
जळगाव : रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात सोमवारी सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आलं आहे. सुकी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी ६.३० वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे होते आणि पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला होता. तसंच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचावकार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसंच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली. प्रांताधिकारी कडलग आणि तहसीलदार श्रीमती देवगुणे यांनी स्थानिक नागरिक तसंच पोहणारे इम्रान शहा रतन शहा (रा. पाल), संतोष दरबार राठोड (रा.पाल), रतन भंगी पावरा (रा.गारखेडा), तारासिंग रेवलसिंग पावरा (रा.गारबर्डी) आणि सिद्धार्थ गुलजार भिल यांच्या मदतीने मुक्ताईनगर येथील या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. यासाठी त्यांना स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील कार्यालय, सावदा पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले.
सुकी नदीपात्रात अडकलेल्या व सुटका झालेल्या व्यक्तींची नावे :
१. अतुल प्रकाश कोळी २. विष्णू दिलीप कोलते ३. आकाश रमेश धांडे ४. जितेंद्र शत्रुघ्न कूंडक ५. मुकेश श्रीराम धांडे ६. मनोज रमेश सोनावणे ७. लखन प्रकाश सोनावणे ८. पियूष मिलिंद भालेराव ९. गणेशसिंग पोपट मोरे
सर्व रा. मुक्ताईनगर. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदीपात्रात पाण्याची अचानक वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात तसंच धरण परिसरात जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.