जळगाव :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील सर्व समीकरणे बदलून गेली आहेत. जे नेते कधीकाळी ठाकरे कुटुंबाची ढाल म्हणून ओळखले जात होते, तेच नेते आता थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तींवरच टीकेचे बाण सोडत आहेत. माजी मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील हेदेखील अशाच बंडखोर नेत्यांपैकी एक आहेत. पाटील यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेवरून जोरदार टोला लगावला आहे.
‘मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. त्यांनी तरी राज्याचे दौरे करायला हवे होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर ते संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आदित्य यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, ठाकरे पितापुत्रावर निशाणा साधत असताना गुलाबराव पाटील यांनी खरे शिवसैनिक आम्हीच आहोत, या दाव्याचाही पुनरुचार केला आहे.