Wife Refused to Recognize Husband: बिहारच्या सहरसामध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. पोलीस दलात नोकरी लागताच पत्नी पतीला विसरली. पत्नीनं पतीला ओळखण्यास नकार दिला. आता पती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात पीडित पतीनं समस्तीपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे.

हायलाइट्स:
- पोलीस होताच पत्नीला पतीचा विसर
- पतीला ओळखण्यास पतीचा नकार
- पतीचा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
राजेंद्र कुमार (नाव बदललेलं) नावाच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, रजनी कुमारी (नाव बदललेलं) नावाची एक तरुणी त्याला विमानतळ मैदानात भेटली. दोघांची ओळख झाली. त्यावेळी मैदानात दोघे भरती परिक्षेसाठी आले होते. बिहार पोलीस दलात भरतीसाठी तरुणी प्रयत्नशील होती. तर पीडित तरुण लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत होता. त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
लग्नाआधी राजेंद्र आणि रजनी नया बाजार परिसरात ४ महिने सोबत राहिले. त्यानंतर गेल्या महिन्यात दोघांच्या कुटुंबीयांनी सहमतीनं त्यांचं लग्न लावून दिलं. सहरसामधील मटेश्वर धाम मंदिरात दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर पत्नीला बिहार पोलीस दलात रुजू होण्याचं पत्र आलं. त्यानंतर रजनी पैशांची मागणी करू लागली. रजनीसाठी आतापर्यंत १४ ते १५ लाख रुपये खर्च केल्याचं राजेंद्र यांनी सांगितलं. यानंतर रजनी प्रशिक्षणासाठी गेली. राजेंद्र तिथे रजनीला भेटायला गेले. मात्र तिनं त्यांना ओळखण्यास नकार दिला.
यानंतर राजेंद्र काही दिवसांनी पुन्हा एकदा रजनीला भेटण्यास गेला. त्यावेळी रजनीनं एक शिपायाच्या माध्यमातून राजेंद्र यांना दटावलं आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. प्रशिक्षण संपल्यावर आपण सोबत राहू, असं आश्वासन त्यावेळी रजनीनं दिलं होतं, असं राजेंद्र म्हणाले.
प्रशिक्षण संपल्यावर पत्नी गावाला आली. तिनं पंचायत बोलावली आणि चार-पाच लोकांना बसवून त्यांच्यासमोर आता मला पतीसोबत राहायचं नसल्याचं सांगितल्याचा आरोप राजेंद्र यांनी केला. यानंतर राजेंद्र यांनी समस्तीपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी अर्ज केला. राजेंद्रची पत्नी सध्या पिटोरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित तरुण सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दोघांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network