नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते. खोतकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात जातील, असं बोललं जात असतानाच ही भेट झाल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वीच मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोतकरांवर उपनेतेपदाची जबाबदारीही सोपवली होती. मात्र आज खोतकर हे थेट दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे या मराठवाड्यातील दोन नेत्यांमध्ये समेट घडवून आणल्याचे समजते. कारण खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार आणि खासदारांनी बंड केल्यानंतर अर्जुन खोतकर कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू आहे.

कोल्हापुरात धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा, शिवसैनिक आक्रमक, पोलिसांकडून धरपकड

भाजपसोबत गेलेल्या शिंदे यांना पाठिंबा द्यायचा झाल्यास रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध होत असलेल्या संघर्षाचं काय, असा प्रश्न खोतकर यांच्यासमोर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणल्याची माहिती आहे.

दरम्यान, अर्जुन खोतकर हे गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्याही टार्गेटवर आहेत. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी खोतकर हे शिवसेनेपासून दूर जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र अद्याप त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here