वाहतूककोंडी व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं प्रवासवेळेत सध्या वाढ झाली आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास अडकून राहण्याचा अनुभव मुंबईकरांना नवा नाही. तसंच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. याच संदर्भात अभिनेता सुमीत राघवन यानं एक ट्विट केलं आहे.
सुमीतनं CMOMaharashtra ला टॅग करत हे ट्वीट केलं आहे. आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो, असं सुमीतनं त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
सुमीत राघवननंही मेट्रोतील कारशेडसंदर्भातही भूमिका मांडली आहे. आरेमधल्या मेट्रो कार शेडबाबत सुमितनं आतापर्यंत बऱ्याचदा ट्वीट्स करून आपली मतं मांडली आहेत. यावेळी त्यानं आंदोलकांना सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सुमितनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करत ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं, ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस , तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?’ असा थेट सवालही त्यानं केला होता.