auto taxi strike in maharashtra, राज्यात १ ऑगस्टला टॅक्सी-ऑटो चालकांचा संप, मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये फटका; काय आहे मागणी – taxi fare in mumbai indefinite strike of auto taxi drivers in maharashtra from july 31
मुंबई : मुंबईमध्ये लोकल ट्रेननंतर टॅक्सी हीच प्रवाशांची लाईफलाईन आहे. पण या टॅक्सींच्या सर्वात मोठ्या युनियनने ३१ जुलैनंतर १ ऑगस्टपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. सरकार भाडेवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मुंबई टॅक्सीमन युनियनने १ ऑगस्ट रोजी टॅक्सी संपाची हाक दिली आहे. पण या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
अधिक माहितीनुसार, युनियनने सरकारकडे भाड्यात १० रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मुंबईतील काही ऑटोरिक्षा संघटनांनी असंही म्हटलं आहे की, ते ३१ जुलैपर्यंत सरकारच्या भाडेवाढीची वाट पाहतील, जर यावर विचार झाला नाही तर रिक्षाचाही संप असणार आहे. दरम्यान, ऑटो युनियन किमान भाड्यात ३ रुपये वाढीची अपेक्षा करत आहेत. म्हणजेच सरकारने किमान भाडे २१ रुपयांवरून २४ रुपये करावं. मोठी बातमी! एड्सवरील औषधांचा तुटवडा; १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरटीए (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी) या आठवड्यात ऑटोच्या भाड्यात वाढ करायची की नाही यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. TOI शी बोलताना टॅक्सी युनियनचे नेते एएल क्वाड्रोस म्हणाले की, “भाडे वाढवण्याची खूप गरज आहे. कारण, २०२१ मध्ये शेवटच्या भाडे सुधारणानंतर सीएनजीचा दर ४८ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे.” सरकारला शिफारस करण्यात आली होती की मागील भाडे सुधारणेनंतर सीएनजी २५ % पेक्षा जास्त वाढल्यास, टॅक्सीचे भाडे त्वरित सुधारित केले जावे.
ते पुढे म्हणाले की, मुंबई टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांना रोज ३०० रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं. अशात वाहतूक पोलिसही अनेकदा कारवाई करून पैसे उकळतात. त्यामुळे भाड्यामध्ये वाढ झाल्यास आर्थिक बाजू स्थिर होईल, अशी मागणी आहे.