वेस्ट इंडिजच्या भूमीवर प्रथमच एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. या ऐतिहासिक मालिका विजयात शुभमन गिलने महत्वाची भूमिका बजावली. त्याने नाबाद ९८ धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय ४ खेळाडूंचा या विजयात महत्वाचा वाटा होता. विशेष गोष्ट म्हणजे भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम देखील मोडीत काढला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. नाणेफेक जिंकून भारताने पहिली फलंदाजी केली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे षटकं कमी करण्यात आले होते. त्यामुळे सामना ४० षटकांचा करण्यात आला होता. परंतु, ३६ षटकं झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळी इथेच थांबवण्यात आली. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला ३५ षटकांमध्ये २२५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण वेस्ट इंडिजचा संघ केवळ १३७ धावांवर गारद झाला. भारतीय संघाकडून शुभमन गिलने धडाकेबाज खेळी करत ९८ धावा केल्या मात्र, अवघ्या २ धावांमुळे गिलचे शतक हुकले. तर यजुवेंद्र चहलने ४ विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजच्या गडाला भगदाड पाडले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
शुभमन गिलने ९८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ७ चौकार लगावून नाबाद ९८ धावांची खेळी केली. तर कर्णधार शिखर धवन ५८ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने गिलला साथ देत ४४ धावा केल्या त्यामुळेच सामनावीर आणि मालिकावीर म्हणून निवड झाली. गिलला अजून २ षटकं खेळायला मिळाली असत्या तर त्याने शतकाला गवसणी घातली असती.
भारताने इतिहास रचला
भारतीय संघाने अखेर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये इतिहास रचला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी पराभव केला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विश्वविक्रमही मोडीत काढला.