‘मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…’ हा संवाद महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील राजकारणाला नवा नाही. पण, आता याच नावाची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता हेच सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणातील सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. आता या सीरिजमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यातील संभाषण आहे. मुख्यमंत्री पद, गृहमंत्रीपद आणि नगरविकास खातं…या तीन महत्त्वाच्या पदांसंदर्भात हा संवाद आहे. उपेंद्र सयाजी शिंदे यांना म्हणतो की, ‘चला गृहमंत्रीपद तुम्हाला, खूष…?’ यावर सयाजी म्हणतात की, ‘नाय.. मला नगरविकास पाहिजे.’ यावर परत उपेंद्र म्हणतात, ‘बस्स काय… नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेक्टर वाटेल ना’, असा संवाद असलेला हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल झालाय.
पाहा व्हिडिओ:
हा संवाद सीरिजमधला असला तरी राज्याच्या राजकीय सत्तानाट्याशी याचं जवळचं कनेक्शन आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं होतं. हा व्हिडिओ त्याची आठवण करून देतोय.
या सीरिजची खास गोष्ट म्हणजे म्हणजे याचं लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे. याचा वास्तवाशी संबंध नाही, असं अरविंद जगताप सांगत असले तरी, सीरिजमधील एकना एक गोष्ट सध्याच्या नाट्यमय सत्तासंघर्षाची मिळती जुळती आहे.
या वेब सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर अशी दमदार कलाकारांची फळी आहे.
वेब सीरिजविषयी अरविंद जगताप सांगतात, ‘बहुमतासाठी पक्षांची चाललेली केविलवाणी धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थानं कुठल्या थराला जातात याचं गमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’ या कलाकृतीत केलं आहे. याचा तसा वास्तवाशी फार संबंध नाही. कारण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. हा राजकीय धुळवडीचा रंग आहे. हे राजकीय व्यंग आहे. पण शेवटी विषय राजकारण आहे. कधी-कधी काही गोष्टी खऱ्या वाटतील, पण त्या खऱ्या नाहीत. राजकारणाचं काही खरं नाही, हे सांगणारी ही वेब सीरिज आहे.’